Thursday, 29 October 2015

दुभंगलेली नाती :

वस्तू जुन्या झाल्या किंवा नकोश्या झाल्या, कि आपल्याला ती अडगळ वाटायला लागते, मग आपण घर सफाईच्या नावाखाली अश्या वस्तुंना बाहेरचा रस्ता दाखवतो. प्रेमाचं पण तसच काहीसं आहे. एकेकाळी जीवापाड जपलेल नात, काळाच्या ओघात नष्ट होत. ज्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय दिवस सुरु झाला असे वाटत नसे, आपली सर्व सुख दुख जीला सांगितल्याशिवाय आपल्याला करमत नसे, तिच्या सुख दुख्खात पण आपण तेवढ्याच तन्मयतेने समरस होत असु, अशी नातीही कधी कधी जड वाटायला लागतात, मग एकमेकांच्या वागणुकीत दोष आढळायला लागतात. त्याची कारणे काहीही असू शकतात. पण परिणाम एकच असतो. मग आपण अश्या जड नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारण शोधायला लागतो. नात जोडायला खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु ती तोडण्यासाठी अगदी फुटकळ कारणही पुरतात. उदाहरणादाखल "तुझ माझ्याकडे लक्षच नाही" किंवा अगदी याच्या उलट म्हणजे "तू माझ्यावर फारच देखरेख करतोयस / करत्येस", "किती प्रश्न विचारतोस / विचारतेस? घुसमट होत्ये अगदी", "मी का म्हणून तुझं ऐकायचं, मला माझे निर्णय घेता येतात" इत्यादी. खर म्हणजे या वाक्यांना किंवा नंतर कशालाही काही अर्थ नसतो. ते नात जपण्यासाठी घेतलेले कष्ट विसरून आपण त्यांतून बाहेर पडण्यासाठी त्यात अनेकानेक दोष शोधायला लागतो. आणि मग त्यातूनच विसंवाद वाढीस लागतो. विसंवादातून दुरावा वाढायला लागतो, आणि नात्यातील ओढ नष्ट होते. मग होतो एका चांगल्या नात्याचा अंत. यात दोष कोणाचाच नसतो. असेल, तर तो फक्त काळाचा दोष असतो. नाती जोडताना आपण बऱ्याचदा त्याची भव्यता पाहतो, त्यातील खाचखळगे कालांतराने नजरेस पडतात. सोडायचहि असत आणि तोडायचही नसत, मग होते मानसिक ओढाताण. त्यातूनच शाब्दिक खटके उडायला लागतात, एकमेकांवर असले - नसलेले दोषारोप केले जातात. आणि या सगळ्याच पर्यवसान एका सुखसंवादाच्या नात्याचा अंत होण्याने होतो. हे अस होणं गरजेच होत का? याला दुसरा काही पर्याय नव्हता का? न तोडता एका समान पातळीवर हे नात जपता नसत आल का? हे प्रश्न पुन्हा उभेच राहतात अनुत्तरीत. कारण आपण बरेच निर्णय भावनेच्या आधारे घेत असतो. आणि जीथे भावनाच उरत नाही, तिथे या प्रश्नांनाही काही अर्थ उरत नाही. बघा जमल तर, नात्यात दुरावा येईल इतका विसंवाद होऊ देऊ नका. खूप दुर्मिळ झालीयेत नाती आजच्या व्यावहारिक जगात. दुखावलेल मन सावरायला खूप काळ जावा लागतो आणि जरी काळ गेला तरी जखम भरून येईल आणि दुभंगलेली नाती पुन्हा पूर्ववत होतील याची काही शाश्वती नाही 

2 comments: