Thursday, 3 December 2015

महाराष्ट्र : पुरोगामित्वाची झूल पांघरणारा प्रतिगामी प्रदेश

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या जयंतीदिनी शनि शिंगणापूर येथे एक क्रांतिकारी घटना घडावी हा योगायोगच म्हणावा. महिलांना मज्जाव असणाऱ्या चौथऱ्यावर चढून एका स्त्रीने आपल्या महान रूढी परंपरांचा खून करत स्त्रियांना प्रवेश नसलेल्या भागात जाउन शनि देवाचे दर्शन घेतले म्हणजे फारच झाले. वर्षानुवर्ष फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी स्त्री प्रवेश करते हि घटना हा "पुरोगामी" महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हे शनि देवाचे दुधाने अभिषेक करून आपण दाखवून दिले. समाज निरक्षर राहिला तरी चालेल पण पूर्ण अंधश्रद्ध राहायला पाहिजे याची हा "पुरोगामी" महाराष्ट्र पूर्ण काळजी घेत आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या महान परंपरा आहेत आणि त्यांना छेद देण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि जे तसा प्रयत्न करतील त्यांना या जगातून रीतसर नाहीसे करण्यात येईल हा संदेश आपण अंधश्रद्ध निर्मुलन समितीचे प्रमुख श्री नरेंद्र दाभोळकर व सामाजिक कार्यकर्ते कॉ गोविंद पानसरे यांची हत्या घडवून आणून दिलाच आहे. हो आपणच त्यांची हत्या केली आहे, कारण एवढ होऊनही जर का आपण एक समाज म्हणुन या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध उभे राहणार नसू व जे होतंय ते मूकपणे बघणार असू तर मी म्हणेन कि त्यांच्या हत्येला आपणच सर्व जबाबदार आहोत. चुकीचे कायदे लादले म्हणून इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करणारे हेच भारतीय लोक, सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजा राम मोहन रॉय ना साथ देणारी हीच भारतीय मानसिकता, आज अचानक लोप पावली आहे. आज जो तो फक्त आपल्यापुरते पाहतो आहे. जे घडतंय त्याचा त्रास मला व माझ्या कुटुंबियांना होता कामा नये एवढी संकुचित जबाबदारी आपण बाळगतो आहोत.

एक समाज म्हणून आपण खूप दांभिक आहोत. एका बाजूला आपण शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कशी स्वताच्या आईची उपमा दिली यावर भरघोस चर्चा करतो, स्त्रीला देवीची उपमा देऊन, तिला आदिशक्तीचे रूप मानून तिची पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच स्त्रीला अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या आहारी जाऊन आपण कस्पटासमान वागणूक देतो. जी स्त्री हि जननी आहे, माता आहे, या सृष्टीच्या असण्यामध्ये जिचा बरोबरीचा किंवा जर जास्तच वाटा आहे तिला आपण सृष्टीकर्त्याच्या (?) दर्शनापासून वंचित ठेवतो. आणि याला आपण परंपरेचा बाळसेदार मुखवटा चढवतो. निसर्गनियमांमुळे स्त्रियांना ज्या गोष्टीला सामोरं जाव लागत त्यात तिचा काय दोष? आणि हा झगडा जर का देवाचा आणि स्त्रीचा असेल तर देवालाच निर्णय घेऊ देत कि. आपण का त्यात ढवळाढवळ करतोय. कि देव काही करू शकणार नाही व काही करत नाही यावर आपलाही ठाम विश्वास आहे कि काय? म्हणून आपण स्वतःच या सृष्टीचे नियम ठरवतो आणि ते सर्व समाजाला बंधनकारक करतो कि काय नकळे  

याच समाजाच्या अशाच विचारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करावासा वाटला, आणि एक खूप मोठा समुदाय हिंदू धर्मापासून वेगळा  झाला कायमकरता. आणि असाच विचार आजच्या सर्व महिलांच्या मनात आला तर ? काय गहजब उडेल विचार करा फक्त. कारण विचारांना  कृतीची जोड द्यायलाच हवी अशी काही या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची परंपरा नाही. पण एक नवीच परंपरा इथे जन्म घेताना दिसत आहे आजकाल. ज्यांचे विचार पटणार नाहीत किंवा ज्यांच्या विचारांनी समाज जागृत होणार असेल अश्या सामाजिक भान असलेल्या विभूतीना या जगातून तत्परतेने नाहीसे करायचे, हि ती परंपरा. आणि हे कृत्य करणाऱ्या महान क्रांतीकारकांना हे पूर्ण ज्ञात आहे कि हा महाराष्ट्र आता कधीही पेटून न उठणाऱ्या विझलेल्या ज्वालामुखीसारखा आहे. तुम्ही कितीही घाव घाला येथे परत काही असंतोषाचे जनक निर्माण होणार नाहीत, कि सुधारक जन्म घेणार नाहीत. सेनापती बापट आज हयात असते तर म्हणाले असते कि भारत एक देश म्हणून भले प्रगती करत असेल पण यात महाराष्ट्र कुठे दिसत नाही. (दिसत नाही म्हणजे नैतिकता कुठे दिसत नाही). पुढे जाऊन अस म्हणावसं वाटत कि आज जर ज्योतिबा असते तर या महाभागांनी त्यांचाही खून केला असता आणि आपण तेव्हाही असेच बघत बसलो असतो जसे आज बघत बसलो आहोत.

दिनांक : ०२ डिसेंबर २०१५

एक जाणीव शेअर करतो. झालंय काय कि, टी पी  सुरु झाल्यापासून, तो मिनी ट्रक मीच चालवतोय. आणि आता माझा त्याचावर पूर्ण कंट्रोल आलाय अस मला वाटतंय. आणि तसा आता वेळ कमी मिळतो, मग कुठेही येणजाण पण कमी झालं, त्यामुळे कार चालवण्याचे प्रसंग कमीच येतात. काल अचानक दुपारी एक काम होत म्हणून मी श्री ला म्हंटल कि आज तू माझी कार घेऊन ये. पण नंतर कार चालवताना असा जाणवल कि थोडी गडबड होत्ये चालवताना. काहीतरी चुकतंय. प्रत्येक वाहनचालकाचा आपल्या वाहनावर हात बसलेला असतो. पहिला गिअर टाकल्यापासूनच ते लगेच लक्षात येत. पण गेल्या दीड महिन्यात माझे माझ्या कारकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. ट्रक वर ताबा मिळवताना मी कारचा कंट्रोल सोडत होतो हे लक्षातच नाही आल, कारण दोन्ही गाड्या चालवण्याच टेक्निक थोडं वेगळ आहे. त्यामुळे असाव पण मला कार चालवताना जरा सांभाळून चालवावी लागत होती. ज्या माझ्या कारने मला ड्रायविंगचा मजा दिला, जिला मी मला हवी तशी चालवू शकत होतो, आज मला तिची ओळख थोडी पुसली गेल्यामुळे सांभाळून चालवावे लागत होते. म्हंटल तर दुर्लक्ष करण्यासारखा प्रसंग, पण विचार केला तर खूप काही शिकवून जाणारा. 

जर निर्जीव कारकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रसंग येत असेल, तर काही जिवलग नात्यांकडे नकळत दुर्लक्ष झाले तर काय होईल, असा विचार मनात आला आणि हादरून गेलो. आत्ताआत्तापर्यंत जे मित्र किंवा नातेवाईक आपल्या खूप जवळ होते, ज्यांच्यावाचून आपल्याला करमत नसे, दिवसभरात एकदातरी ज्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसे, अश्या व्यक्तींकडे जर नकळत का होईना आपल्याकडून दुर्लक्ष होत असेल, तर त्यांना काय वाटत असेल. समजून घेतलं तर ठीक, पण नाही समजून घेतलं तर. घरात म्हातारे आई वडील असतात, आज त्यांच्यामुळेच आपण इथवरचा प्रवास केलेला असतो, मुल असतात म्हणजे पुढची पिढी, या सर्वाना वाटत असत कि रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ तरी आम्हाला द्यावा. अगदी तासंतास गप्पा नाही मारल्या तरी निदान चौकशी करावी बास, एवढीच माफक अपेक्षा असते बऱ्याचदा या सर्वांची. पण आपण आपल्यातच इतके गुंग असतो कि या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. नाती टिकवायला संवाद जरुरीचा असतो हा मुख्य नियमच आपण विसरून जातो. आणि जेव्हा लक्षात येत ना तेव्हा थोडा उशीर झालेला असतो. नाती तुटत नाहीत, पण त्यातला ओलावा नष्ट झालेला असतो. 

मान्य आहे कि आजचे आयुष्य खूप धकाधकीचे आणि आव्हानांचे आहे. माणूस स्वतःबरोबरच वेळेशीही झुंज खेळतोय. कितीही मनात आल तरी कित्येकदा प्रत्यक्ष भेट घेण नाही शक्य होत. पण हि धकाधकी तर आता जीवनाचा मुख्य भाग आहे आपल्या, तिच्यापासून तर दूर पळता येणारच नाही. पण ते करताना जर आपण आपले आईवडील, पत्नी, मुल, मित्र व इतर आप्त यांच्यासाठी अधूनमधून थोडा वेळ काढला तर काय बहार येईल बघा. सगळाच समतोल साधला जाईल. या सर्वांशी बोलल्याने तुम्हालाही थोडा विरंगुळा वाटेल आणि त्यानाही थोडं बर वाटेल कि बघा एवढ्या व्यापातून पण हा आमच्यासाठी थोडा का होईना पण वेळ काढतोच. संवाद खूप महत्वाचा भाग आहे मानवी जीवनातला. संवाद नसेल तर नाती तुटायला वेळ लागत नाही, मग ती कितीही जवळची का असेना. 

सांगायचा मुद्दा हा कि, माझा माझ्या कारशी संवाद कमी झाला होता, तर ते निर्जीव यंत्र पण साथ देईना  झालं, मग भावभावनांचा कल्लोळ असलेल्या मनांच काय होत असेल. आता ठरवलंय कि कितीही बिझी असलो तरी योग्य तितका वेळ सर्वांनाच द्यायचा, मग ती कार का असेना ….