Sunday, 30 August 2015

सिग्नल यंत्रणेची गरज कोणाला :

त्यादिवशीही नेहमीप्रमाणे सी एस टी स्थानकात उतरलो आणी कफ परेड करिता असलेल्या टेक्सीच्या रांगेत उभा राहिलो. यथावकाश टेक्सी मिळाली आणी वाहनांच्या गर्दीत घुसली. वाहनचालक एक तिशीचा युवक होता. त्यामुळे वयाचा असलेला जोष वा दोष त्याच्यात पुरेपूर होता. मन मानेल तशी आणि बेदरकारपणे तो वाहन हाकत होता. तो ज्याप्रकारे चालवत होता त्याला हाकणे हाच शब्दप्रयोग योग्य आहे. एक दोन वेळा मी त्याला सांगूनहि पाहिले कि बाबा आम्हाला कोणालाही घाई नाही, सावकाश चालवलस तरी चालेल. पण त्याने काही ते मनावर घेतलं नाही व तो आपल्याच धुंदकीत गाडी चालवत होता. मधे येणाऱ्या वाहनांना शिव्या देत आणि मग त्यांना पुढे जाऊन उगाच कट मारत आणि तोंडात अखंडपणे पानाचे चर्वण करत आमची वाहनयात्रा चालू होती. 
ताज विवांता होटेल जवळ त्याने सिग्नल तोडला. मग मात्र मला अजीबात राहवले नाही. मी म्हंटले "अरे यार सिग्नल का तोडला? दुसरे कुठले वाहन धडकून अपघात झाला असता मग?" त्यावर त्याचे उत्तर आले "साहेब या सिग्नलला कधीच पोलिस उभा नसतो". दोन मिनिट मला कळलेच नाही कि याला म्हणायचे काय आहे. सिग्नल रस्त्यावरच्या वाहनांसाठी आहे कि पोलिसांसाठी? माझी मतीच कुंठीत झाली. त्याचे अजून काही बौद्धिक घेऊ म्हंटले तर तो ऐकून घेणारा वाटला नाही आणि माझे उतरायचे ठिकाणही तोवर आले. 

पण त्याचा युक्तिवाद विचार करायला भाग पाडून गेला. कि, खरच या सिग्नल यंत्रणेची खरी गरज कोणाला? वाहतूक सुरळीत चालु  रहावी म्हणुन वाहनांना कि सिग्नल तोडला कि चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांना? आपणही बऱ्याचदा हेच करत असतो. अगदी सकाळी किंवा अगदी रात्री पोलिस जर जागेवर नसेल तर आपल्यापैकी बरेच लोक सरळ सिग्नल तोडून पुढे निघून जातात. एखादा रस्ता सुद्धा "नो एन्ट्री" केलेला असेल तर पोलिसांची ड्यूटी संपली कि बिनधास्तपणे त्या रस्त्यावर गाडी घालताना आपण काही चूक करीत आहोत, असे आपल्या मनालाही शिवत नाही. परदेशातली वाहन शिस्तीची कायम उदाहरणे देणाऱ्या आपणाला इथली वाहतूक नियामकता न पाळण्यात काय आनंद मिळतो कोण जाणे. एकाने सिग्नल तोडला कि, कसायाकडे जाणाऱ्या बकऱ्याप्रमाणे इतर वाहनेही त्याच्या मागोमाग वाहने घालतात आणी पूर्ण वाहतूक यंत्रणेची ऐशीतैशी करून टाकतात. आणी मग पुर्ण फियास्को झाला कि कुठून तरी एक पोलिस उगवतो आणी मग तो त्याच्या भाषेत सर्वांचा उद्द्धार करून वाहतुक नियमित करण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य आपल्या सर्वांच्याच इतके अंगवळणी पडले आहे कि हे असेच चालायचे हे आपण गृहीत धरतो आणी वाहतूक सुरळीत व्हायची वाट पाहतो. 









किनारे :

कधी म्हंटल तुला तु माझ्यात एकरूप हो म्हणुन,

शक्य नाही ते, मी ही जाणतो.

दोन किनारे आहेत, आपली आयुष्य म्हणजे,

कधीही न जुळणारे.

कितीही ओढ असली तरी, एक होऊ न शकणारे,

किनाऱ्याना पण त्यांची मर्यादा ठाऊक असते,

मलाही ठाऊक आहे ती आणि तुलाही.

ते मनांत आलं म्हणुन, जागा सोडु नाही शकत,

पण लक्ष ठेऊन असतात दुरूनच एकमेकांवर,

निरोपही धाडतात कधी, भरती ओहोटीच्या लाटांवर.

भेटत नाहीत म्हणून, ओढ जरी त्यांच्यातली संपत नाही,

परंतु न भेटण्याचं सल, मनातुन मात्र जात नाही.

त्या किनाऱ्यावर तुझी वाट पाहतोय मी,

तु येशील कधीतरी, या खोट्या आशेवर जगतोय मी,

तु येशील कधीतरी, या खोट्या आशेवर जगतोय मी.






Tuesday, 18 August 2015



कुछ मेरी कहानी तेरी थी, कुछ तेरी कहानी मेरी,
कहानिसेभी कभी बढकर थी दोस्त, ये तेरी मेरी यारी. 

कुछ मेरे फसाने तेरे थे, कुछ तेरे फसाने मेरे,
युहि फसाने बनते दोस्त, अगर तु होता साथ मेरे. 

कुछ मुझसे शिकायत थी तुझे, कुछ तुझसे गिला मुझे,
दो पल की मोहलत देते दोस्त, ना अफसोस रहता तुझे. 

अब हो गये रस्ते जुदा अपने, किस्मत कि है बात,
पर तु रहेगा हमेशा मेरे दिलमे, हो ना हो तेरा साथ

Thursday, 6 August 2015


हवाहवासा राग तुझा :

रागावलीस कि तु काही वेगळीच भासतेस,
चेहेऱ्यावरती राग दाखवुन, मनोमन मात्र हसतेस,
संध्याकाळचा रक्तीमा तुझ्या गालावर उतरतो,
नाकाचा शेंडा लाल होतो, हातांचा चाळा पण वाढतो,
बघत बसावं तुझ्याकडे असा तो नजारा असतो,
आणि, यासाठीच तुला मी वारंवार चिडवतो,
काय तुझं रागावणं तरी, एक दिवसही टिकत नाही,
तुझ्या स्वभावामधे कायमचा राग, बसतच नाही. 
पण तो तेवढ्या वेळेचा अबोला, ब्रम्हांड आठवुन देतो,
संपलं आता सार, अस मग सतत वाटत राहत.
खर सांगतो, तु पुनः बोलेपर्यंत, माझ्या जीवात जीव नसतो,
त्यावेळी मात्र आठवणीने मी, देवाचा धावा करतो. 
तु पुनः बोलायला लागलीस की, देवावरचा विश्वास वाढीस लागतो,
तुला चिडवण्यासाठी मग मी पुनः, नव्या जोमाने कामाला लागतो ....