आज प्रकर्षाने तुझी आठवण आली. तुला विसरलो नव्हतोच कधी, पण आज तू हवी होतीस, अस वाटल. तू माझी कोण होतीस या गोष्टीला आता काही अर्थ उरला नसला, तरी एक नक्की, तू माझी गरज होतीस. माझा आधार होतीस. मी विस्कटलो कि मला सावरणारी तूच एक होतीस. तु जेवढ मला समजून घेतलस, तेवढे कोणी प्रयत्न पण नाही केले. जगात वेड्या माणसाना किंमत नसते. सर्वाना शहाणी माणस हवी असतात. आणि तू मात्र या वेड्याला कधी तू वेडा आहेस हे जाणवू पण नाही दिलंस. हा तुझा शहाणपणा होता कि वेडेपणा यावर लोक चर्चा करतील. पण मी मात्र सदैव तुझा ऋणी राहीन, कि या वेड्या माणसाला तू आहेस तसा स्वीकारलस. कधीच उपदेशाचे डोस नाही पाजलेस.
तू असताना कधी एकट अस वाटलच नाही. कुठल्याही प्रसंगात तू कायम बरोबर असायचीस. फक्त सल्ले नाही द्यायचीस. बरोबरीने उभी राहायचीस. खूप आधार वाटायचा तुझा मला. पण हे अस कुठवर चालणार होत. तू स्वतःचा काही विचार करतच नव्हतीस. जशी काही फक्त माझ्यासाठीच जगत होतीस. माझी पूर्ण जबादारी स्वीकारल्यासारखी. माझ्या भविष्याचा पत्ता नव्हता, पण तुझ्यापुढे पूर्ण आयुष्य पडलं होत. माझ्यासाठी तू खस्ता खावयास हे मनाला पटत नव्हत माझ्या. मग मीच तुला हळूहळू टाळायला सुरुवात केली. कुरबुरी काढून तुझ्याशी फटकून वागायला लागलो. आणि शेवटी तो दिवस उगवलाच. तुझा अखेरचा निरोप पण मी नीट नाही घेतला, आयुष्यात पहिल्यांदा तुला पाठ दाखवली. तोंड दाखवायची हिम्मत नव्हती म्हणून नव्हे तर, माझे रात्रभर रडून सुजलेले डोळे तुला दाखवायचे नव्हते. नाहीतर तू तुझा निर्णय बदलला असतास याची मला खात्री होती. तू तशीच होतीस. पाठमोरी, पाय खेचत नेणारी तुझी आकृती बघून मात्र माझा बांध फुटला आणि मी पुन्हा एकदा वेड्यासारखा डोळ्यातून समुद्र सांडत सैरावैरा धावत सुटलो. तो आजवर थांबलोच नाही.
आयुष्य पुढे सरकत गेल. वाटा शोधत गेल. पडलो, धडपडलो, रडलो. तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. प्रत्येक ठेचेला तुझी आठवण यायची, मग मी सावरायचो. भीती वाटायची कि असाच रडत राहिलो तर तू स्वतःचा संसार सोडून माझ्यासाठी परत येशील. स्वतः विस्कटून मला सावरायला.
एवढ्या लांबच्या प्रवासात खूप प्रवासी भेटले. काही मित्र झाले, काही सोडून गेले. प्रत्येक गोष्टीत वाकडा अर्थ काढणाऱ्या माणसाला कोणीही किती काळ आणि का सहन करेल. स्वभावातले स्वाभाविक दोष कळल्यावर लोक टाळायला लागले. मला कळायच कि दोष सर्वस्वी माझाच आहे. पण मला सवय लागून गेली होती किंवा तू कधी माझ्यातील दोषांना दोष मनालाच नाहीस, त्यामुळे असेल पण मला ते कधी दोष वाटलेच नाहीत. आणि तसही समुद्रात पोहोणाऱ्याला, तलावात पोहायचं अप्रूप नसतं. तसच ज्याची तुझ्याशी मैत्री होती, त्याला असल्या लोकांची काय मातब्बरी.
पण तरीही कधी कधी मागे वळून पाहताना, आयुष्याचा हिशेब मांडला, तर माझ्या बाजूला शुन्य उरते. तुला गमावले आणि सर्वस्व गमावल्यासारखे झाले. पण तू खूप आठवणी सोडून गेलीस माझ्यासाठी. तुझी एक एक आठवण माझा श्वास आहे आता. कधीही एकटा पडलो कि तुझी आठवण येते. अस वाटत तू अजूनही बरोबर आहेस. आणि माझा हात हातात घेऊन मला धीर देत्येस. मग मी खूप धीराने डोळ्यातून ओघळायला आतुर असलेले अश्रू परतवून लावतो, कारण मला अजूनही वाटत, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तू परत येशील माझ्यासाठी. मला खात्री आहे त्याची. तू आहेसच तशी.