ती : एकदा आली आणि जिंकून गेली
शाळा सुटली, पाटी फुटली,
शाळामैत्रांची संगत सुटली,
इतक मोकळ आभाळ मिळालं,
कि आपापल्या विश्वात हरवून गेली,
गावे बदलली, शहरे बदलली,
कित्येकांनी तर देशाची हद्द ओलांडली,
अशाचं काही जणांमध्ये ती पण होती,
सातासमुद्रापार गेली होती,
शाळेत असताना जास्त बोलाचाल नव्हती,
एकमेकांच्या स्वभावाची काहीच जाणं नव्हती,
पण या तंत्रयुगाने तिलाही जवळ आणलं,
पण अजूनही नव्हत मन मनाशी जुळलं,
तो अबोला काही सुटेना,
बोलायचं तर खूप होत, पण काय बोलावं सुचेना,
तशातच तिचा मायदेशी येणं झालं,
हरवलेल्या आठवणीना भेटणं झालं,
जुने मैत्र नव्या रुपात भेटल्यावर,
मुळच्या खोडकर स्वभावाला नव क्षितीज मिळालं,
बोलण्यातला बुजरेपणा कुठच्याकुठे पळून गेला,
तिच्या या नव्या रूपाने ग्रुप मात्र हरखून गेला,
बोलणं तिच मृदू, पण स्वभाव तिचा मिश्किल,
कोणाची कशी फिरकी घेईल, हे सांगणं आता मुश्किल,
इथे असतो दिवस तेव्हा तिथे रात्र असते,
ती मात्र संवाद साधत रात्रीचा त्या दिवस करते,
कवितेची तिला आवड आणि चांगल्या शब्दांची तिला जाण आहे,
इंग्रजांच्या देशात राहूनही, मराठी तिचा प्राण आहे,
राहते जरी इतक्या दूर, तरी लक्ष तिच इथेही असते,
वावगं कोणी वागलं तर निषेधही ती प्रगट करते,
दिसायला पण ती सुंदर आणि बोलण्यात तिच्या माधुर्य आहे,
आगाउपणा थोडा आहे अंगात, पण वागण्यात तिच्या चातुर्य आहे,
वाटलं नव्हतं इतकी खुलून येईल ती,
इतकी मिसळून जाईल आणि फुलून येईल ती,
एकाच सफरीमध्ये ती मन सर्वांचं जिंकून गेली,
एक सुस्वभावी, समतोल विचारांची मैत्रीण आम्हाला मिळाली,
एका भेटीमध्ये तिचा परकेपणा संपून गेला,
इतके मिसळलो एकमेकांत कि,
अवघा रंग एकची झाला ….